Monday, November 17, 2025

#३६ दुर्योधन - लेखक काका विधाते

#BookReview3/2025.  #दुर्योधन

भारतवर्ष सम्राट दुर्योधन महाराज जयतू जयतू 🙏

मध्यंतरी कोणीतरी मुंडेंना दुर्योधनाची उपमा दिली, त्यामुळे काका विधातेंची "दुर्योधन" ही तब्बल १०४८ पानांची अजरामर कादंबरी वाचायला घेतली. प्रत्येक पानावर महाभारतातील कौरवांची बाजू मांडणारे तार्किक आणि  रोमहर्षक वर्णन कदाचित कोणीही केले नसेल.
मुळात मी विद्रोही वृत्तीचा असल्याने कौंतेय आणि त्यांचा मायावी कृष्ण यांच्याविषयी माझ्या मनात पूर्वग्रह होताच आणि ही कादंबरी वाचून सम्राट दुर्योधन हाच धर्माने, हक्काने आणि नैतिकतेने हस्तीनापुरचा युवराज होण्यास योग्य होता हे मनोमन पटते. भ्रांतचित्ती कौंतेयांचा जन्म कुठल्याशा वरामुळे झाला वग्रे EVM छाप स्टोर्या त्या दासीपुत्र विदूराने पसरवल्या, लाक्षागृहात एका निषाद स्त्रीला आणि तिच्या पाच पुत्रांना जाळून दोष दुर्योधनावर टाकला, ही याच्याच सुपीक डोक्यातली आयडिया. द्युतात शकुनी मामांनी जरूर आपल्या कलेने विजय मिळवला असेल, पण युधिष्ठिराला देखील कौरवांच्या राज्याचा मोह होताच की!! म्हणून तर त्याने स्वतःसह बाकी कुंतीपुत्र,फुकटात मिळालेले इंद्रप्रस्थ आणि द्रौपदीला डावावर लावले. स्त्री जातीचा सर्वोच्च अपमान केला युधिष्ठिरानेच. अर्जुनाने स्वयंवरात जिंकली असताना वाटून घ्यायचा नीच निर्णय घेतला त्यानेच. अर्थात यज्ञकुंडातून जन्मली असा रंग फासून शूद्रकुलीन द्रौपदीला क्षत्रिय कुळ फुकटच मिळाल्याने स्वयंवरात सुतपुत्र संबोधून कर्णाचा आणि मयसभेत आंधळ्याचा पुत्र आंधळा अशी दुर्योधनाची निंदा करणारी उन्मत्त गुणाचीच ती!
आणि राजकीय खेळ्या करणाऱ्या माधवाने तरी कुठे कौंतेयांना युद्धनीतीने वागू दिले. आधी जसे त्याने कंसाला अंतर्गत कलहाने मारला, तसेच जरासंधाला, भीष्मांना, गुरू द्रोणाचार्य, अंगराज कर्ण, शल्याला युद्धात आणि शेवटी दुर्योधनाची हत्या देखील मांडीवर गदेने वार करून केली भीमाने!!
"अर्ध राज्यच काय, पण सुईच्या अग्रावर मावेल इतका या भूमीचा धूलिकणही मी जिवंत असेपर्यंत कौंतेयांना मिळणार नाही" इतका निग्रही गांधार नरेश होता. घनिष्ट मित्र कर्ण याच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या बळावर दिग्विजय मिळवून युवराज दुर्योधन भारतवर्षाचा सम्राट झाला होता. दूरदृष्टी राजा होता. चांगला पती होता, पुत्र होता, पिता होता. कृष्णाच्या कनिष्ठ यादव कुळात आपली लाडकी कन्या लक्ष्मणा देताना दुर्योधनाची झालेली घालमेल कादंबरीत सुरेख रेखाटली आहे. 
दुर्योधन शेवटच्या श्वासापर्यंत लढला आणि क्षत्रिय धर्म जागला. 
कादंबरी अश्वथामा पांडवपुत्रांचा नायनाट करून दुर्योधन भार्या -भानुमती आणि पौरवीला सती जाताना पाहून दूर मृत्यूच्या पूर्णविरामापर्यंत भटकंतीला निघून गेला याठिकाणी येऊन थांबते.

ही कादंबरी महाभारत हे धर्मयुद्ध नसून राजकीय युद्ध होते हे तार्किक मुद्यांवर पटवून देते. सध्या पोहताना मी सारखा या महाभारतातील कथानकाचा विचार करत असतो, इतकी ही कादंबरी पछाडून टाकते मनाला.

सरतेशेवटी, सम्राट दुर्योधन साधु साधू इतकंच 🙏

No comments:

Post a Comment